प्रा. यशवंतराव केळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त रावेरमध्ये ‘यशवंत गुणगौरव सोहळा’ उत्साहात संपन्न

रावेर – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रावेर शाखेच्या वतीने प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘यशवंत गुणगौरव सोहळा’ स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, रावेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात स्वामी एज्युकेशनल ग्रुपचे अध्यक्ष प्रा. रविंद्र पवार, माऊली हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. योगिता पाटील, तसेच अभाविप देवगिरी प्रांताच्या मंत्री कु. वैभवी ढिवरे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. यशवंतराव केळकर यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी त्यांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगण्यात आले. प्रा. यशवंतराव केळकर हे एक प्रखर विचारवंत, शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९२० रोजी पंढरपूर येथे झाला. मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थी संघटनांमध्ये सक्रिय भूमिका बजावली.ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) एक महत्त्वाचे आधारस्तंभ होते.

त्यांच्या विचारांमधून ‘जागरूक, बांधिलकीची जाणीव असलेला आणि सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारणारा विद्यार्थी’ घडवण्यावर त्यांनी भर दिला. ABVP मध्ये त्यांच्या योगदानाची दखल घेत दरवर्षी ‘प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार’ दिला जातो.कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच सामाजिक जाणीव ठेवत पुढे जाण्याचे आवाहन केले.

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रनिष्ठा आणि प्रेरणा जागृत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *